जामनेर पंचायत समिती सभागृह येथे कृषि विभागा मार्फत खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन ...।
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर
जामनेर: आज पंचायत समिती सभागृह येथे कृषि विभाग,जामनेर यांचेमार्फत खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. श्री. संभाजी ठाकूर साहेब, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक हे उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कृषी विभागाची खरीप नियोजनाची रूपरेषा मांडली. या कार्यक्रमास उपस्थित मार्गदर्शक श्री.वैभव सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव यांनी उंच सरी व वरंबा (BBF) पद्धतीच्या पेरणी यंत्राने पेरणी केल्याने होणारे फायदे आणि उत्पादन वाढ याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्री.अतुल पाटील, कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी तालुक्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीचे सूत्र शेतकऱ्यांना समजावून सांगितले. सिजेंटा कंपनीचे श्री अमित लाहोरे साहेब यांनी मका पिकावरील उशिरा येणारा मर रोग याबाबत माहिती दिली.कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.रविंद्र महाजन, यांनी फळबाग लागवड याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
तालुक्यातील नैसर्गिक शेतीचे प्रणेते संग्राम राजपूत यांनी नैसर्गिक शेती करण्याची आवश्यकता, त्याचे फायदे, जीवामृत, बिजामृत आणि निंबोळी अर्क तयार करून त्याचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी ढेपले साहेब यांनी बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी.तसेच प्रतिबंधित HTBT वाण वापरु नका असे आवाहन केले. कृषी विभागाचे सुनील गायकवाड साहेब आणि अकिल तडवी यांनी बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके उपस्थित शेतकऱ्यांना करून दाखवली.
माननीय संभाजी ठाकूर साहेब यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे व तो टिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे.तसेच बीज प्रक्रियेचे महत्व नमूद करताना बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीप पाटील, कृषी पर्यवेक्षक यांनी तर राकेश पाटील यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रमास कृषी विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment