निवडणुकांचे रणकंदन: नव्या राजकारणाची चाहूल...
मुख्य संपादक शांताराम झाल्टे
महाराष्ट्रात गेली ३ ते ४ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या सगळीकडे प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू होता. लोकशाही व्यवस्थेत ही एक चिंताजनक बाब होती. मात्र नुकत्याच न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या निवडणुकांना गती येणार असून दिवाळीनंतर निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासन सज्ज, पक्ष सज्ज, पण जनता सजग
सर्वच राजकीय पक्ष आता हालचालींना गती देत आहेत. ठिकठिकाणी नेत्यांचे दौरे, स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका, आणि मतदारसंघ पातळीवर समीकरणं जोखण्याचं काम सुरू आहे. मात्र हे चित्र जुनं नाही, यामध्ये जे वेगळं आहे ते म्हणजे जनता आता केवळ पाहणारी नसून विचार करणारी आहे.
नवे मतदार, नवे उमेदवार आणि नव्या आशा
आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर मतदान यंत्रणेत दाखल झाली आहे. ही पिढी शिक्षित आहे, माहितीपूर्ण आहे, आणि पारंपरिक राजकारणाच्या पलिकडे पाहते. त्यामुळे अनेक नवखे पण जाणकार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरायला उत्सुक आहेत. गावोगावच्या तरुणांनी आता केवळ मत मागायचं नाही तर काम करून दाखवायचं अशी भूमिका घेतलेली आहे.
राजकारणाला लागला आहे नव्या तंत्रज्ञानाचा स्पर्श
निवडणुकीतील यश हे आता केवळ जोडीने वावरल्यावर किंवा जाहिर सभांवर अवलंबून राहिलेलं नाही. बदलत्या काळाच्या मागणीनुसार, राजकारणाचं व्यवस्थापनही बदललं आहे. हे बदल लक्षात घेऊनच उमेदवारांनी पुढील बाबी अंगीकारायला हव्यात:
मतदानपूर्व सर्वेक्षण: जनतेचा मूड समजून घेण्यासाठी उपयुक्त
मतदार यादी विश्लेषण: कोण कुठे आहे हे जाणून घेतल्याशिवाय विजय मिळवणं कठीण
सोशल मिडिया मार्केटिंग: फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप इथंच तरुण मतदार सापडतो
बूथ कमिटी बांधणी: घराघरात पोहोचण्यासाठी मूलभूत गरज
जनतेशी थेट संवाद: प्रचार नाही, परस्पर सुसंवाद
प्रभावी वक्तृत्व: तुमचं बोलणंच तुमचं मत ठरवतं
प्रचार साहित्य निर्मिती: कल्पक आणि मुद्देसूद साहित्य हे लक्ष वेधतं
रणनीती व वेळ व्यवस्थापन: वेळ गेला की संधीही जाते
जनतेला हवी आहे बदलाची दिशा
आज मतदार कोणत्या जातीचा आहे यापेक्षा तो काय विचार करतो, काय अपेक्षा ठेवतो, हे अधिक महत्त्वाचं झालं आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूळ प्रश्नांवर काम करणारा, तरुण, अभ्यासू आणि पारदर्शक नेतृत्व आज मतदार शोधतो आहे.
लोकांना हवाय त्यांच्यातला एक नेता जो भाषण करतो पण त्याचवेळी ऐकतोही; जो मतं मिळवतो पण माणसंही जोडतो.
राजकारणाचं नवं युग संघर्षाचं नाही, संधीचं
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही फक्त सत्तेची लढाई नाही, तर ती संधी आहे गाव बदलण्याची, माणसं जोडण्याची, आणि खऱ्या अर्थानं सेवा करण्याची. जो या संधीला ओळखेल, तोच खरं नेतृत्व सिद्ध करेल.
शेवटी एकच सांगावं वाटतं
"भिंतीवरून घोषणा ओरडणं सोपं असतं; पण घराघरात विश्वास पोहोचवणं हेच खरं राजकारण असतं."
"जे बदलाला ओळखतील, ते बदल घडवतील."
पारंपरिक राजकारणाच्या जुनाट पद्धती आता कालबाह्य होत चालल्या आहेत. राजकारणाला आता कौशल्य, कल्पकता आणि कनेक्टिव्हिटी या त्रिसूत्रीची गरज आहे.
निवडणुकांचे हे युद्ध फक्त मतांचे नसून मन जिंकण्याचे आहे. आणि मनं जिंकण्यासाठी मनापासून काम करणं आवश्यक आहे.
*उमेश शोभा शहादु मराठे चोपडा*
Founder Executive Director
Freelancer Election Campaign Management Company
www.freelancercampaign.in
९६७३९७२२२१
Comments
Post a Comment